१२. बाजाराची दिशा ओळखा
१२. बाजाराची दिशा ओळखा
बाजार कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे वेळीच ओळखता आले पाहिजे.
बाजारात मंदी येण्याचे संकेत आहेत काय?
यासाठी तुम्ही NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स चा चार्ट नियमितपणे बारकाईने पहिला पाहिजे. हा चार्ट पाहत असताना किंमतीतील बदल आणि त्यातील उलाढाल या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजेत. काही वेळा बाजार वर जात असतानासुद्धा काही शेअर्सच्या किंमती कमी होत असतात. यासाठी बाजारातील सरासरीचा अभ्यास करून चालत नाही. जेव्हा मंदी येणार असते तेव्हा अचानक बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये विक्रीची उलाढाल वाढते. जर असा मंदीचा कल दर्शवला जात असेल तर आपल्या पोर्टफोलो मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे शेअर्स आपण प्रथम विकले पाहिजीत. जर बाजार आणखीन खाली जाण्याचे संकेत दिसत असतील तर तुमच्याकडील जास्तीत जास्त शेअर्स हे तुम्ही आणखीन वाट न पाहता विकले पाहिजेत. आणि जर बाजार परत सुधारण्याचे संकेत देत नसेल तर तुम्ही सगळेच शेअर्स विकून मोकळे झाले पाहिजे. जर तुम्ही खरेदी केलेला शेअर जर खरेदी किंमतीपेक्षा ८% कमी किंमतीला ट्रेड करत असेल तर तो तुम्ही लगेचच विकून टाकला पाहिजे. मात्र तुम्हाला जर त्या कंपनीबद्दल जबरदस्त विश्वास असेल तर तुम्ही ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकता आणि शक्य असल्यास प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर त्यात नियमितपणे खरेदी करतही राहू शकता. मात्र हे सूत्र फक्त आघाडीच्या पहिल्या १०० कंपन्यानाच लागू होते.
बाजार वर जाण्याचे संकेत देत आहे काय?
एकदा का बाजारात फार मोठी मंदी झाली कि बाजार परत उसळी मारण्याचा प्रयत्न करू लागतो. पण हा तेजीचा कल आहे कि नाही हे तुम्ही एक दोन दिवसातील बाजारातील घडामोडींवर ठरवू शकत नाही कारण तो कल फसवा असू शकतो. यासाठी तुम्ही थोडे थांबून बाजारात तेजी सुरु झाल्याची खात्री करून घेतली पाहिजे. जर बाजारातील रॅली सलग ३/४ दिवस सतत मजबुती दाखवत असेल व निफ्टी १% पेक्षा जास्तने सलगपणे बंद होत असेल आणि प्रत्येक दिवशी उलाढाल सुद्धा नियमितपणे वाढत असेल तर समजावे कि बाजारात परत तेजी अवतीर्ण झालेली आहे. जोरदार तेजी हि सलग ६ ते ७ दिवस सतत दिसली तर तो कल खरा मानावा. कधी कधी हा तेजीचा कला खरे पाहतां १० ते १५ दिवसात दर्शवतो, पण असे झाल्यास ती तेजी फसवी असू शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. बाजार कोसळताना तो विक्रीतील जास्त उलाढाल पहिले काही दिवस कायम ठेवतो. जेव्हा बाजारात तेजी सुरु होते तेव्हा एकदम सगळेच शेअर्सच्या किंमती लगेच वाढत नसतात तर प्रथम काही ठराविक शेअर्सच्या किंमती वाढू लागतात व नंतर ती तेजी बाजारात सर्वत्र पसरू लागते. आणि मग सर्वंकष तेजीचा माहौल तयार होतो.
या आघाडीच्या कंपन्यांचा गृहपाठ करून आपल्या यशाची मुहूर्तमेढ रोवू शकतात. शेअर्सची निवड करताना ते शेअर्स कोणत्या किंमतीपासून खाली आलेले आहेत हे पाहून जर त्यांनी योग्य वेळी तेजी सुरु होतानाच खरेदी करणे सुरु केले तर ते मोठा फायदा मिळवू शकतात कारण एकदा का मंदी संपून परत तेजी सुरु झाली कि असे शेअर्स भराभर वर जाऊ लागतात. हि संधी बरेच वेळा म्युच्युअल फंड व्यव्यस्थापक लवकर साधत असतात म्हणून आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनांचा पोर्टफोलिओ नियमितपणे फॉलो केला पाहिजे. जेव्हा एखादा शेअर त्याच्या नीचांकी स्थरापासून २५% वर जातो तेव्हा तो एक पायरी पूर्ण करतो त्यानंतर तो स्थिर होऊ लागतो. यावेळी बरेच गुंतवणूकदार बाजारात परत प्रवेश करू लागतात. परंतु अनेक छोटे गुंतवणूकदार गुंतवणुकीची चांगली संधी गमावून बसतात. तेजीच्या कालखंडात बरेच छोटे गुंतवणूकदार साधारणपणे १०% नफा झाला कि तो शेअर विकून फायदा मिळवतात मात्र ते पुढे मिळणाऱ्या मोठया फायदयाला यामुळे मुकतात. कारण ते या वेळेला शेअरची दुसरी पायरी समजण्याची चूक करत असतात. खरे पाहता तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात बाजारात उडी मारणारे जास्त लोकं असतात जे नुकसान करून घेत असतात. या चौथ्या स्थरावर कंपनीचा सगळीकडे बराच बोलबाला होऊ लागतो. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक टीव्ही वर झळकू लागतात आणि सामान्य गुंतवणूकदाराला वाटू लागत कि आपणही या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन फायदा मिळवू, आणि ते जोराने तो स्टॉक खरेदी करू लागत मात्र यावेळी म्युच्युअल फंड व्यवस्थापक, मोठे व हुशार गुंतवणूकदार त्या शेअर्सची विक्री करू लागतात आणि त्यामुळे काही काळातच त्या शेअरची किंमत कमी होऊ लागते व नव्याने बाजारात आलेले गुंतवणूकदार या सापळ्यात अडकून आपले नुकसान करून घेतात आणि आपल्या नशिबाला दोष देऊन किंवा शेअर बाजाराला जुगार समजून आपले शेअर्स कमी किंमतीला विकून बाहेर पडतात. हे असे ४/५ थरांचे चक्र बाजारात नियमितपणे चालू असते जे गुंतवणूकदार हे वेळीच समजून घेऊ शकतात त्यांना पैसे मिळतात बाकीचे पैसे घालवून बसतात.
बाजारातील मंदीची दिशा कशी ओळखावी?
सामान्यपणे बाजार सरासरी १५% ते २०% किंवा जास्त कोसळला कि समजावे बाजारात मंदीचा कल सुरु झाला आहे.
अस्थिर शेअर्स कधी खरेदी करावेत?
बाजारात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा योग्य वेळी शेअर्सची खरेदी केली तरच चांगला फायदा अल्प किंवा मध्यम मुदतीत मिळवता येऊ शकतो. जेव्हा एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत एकदम वाढू लागते तेव्हा तिच्या मागील खरेदीच्या बिंदू पेक्षा ५% जास्त किंमत असताताना तो खरेदी करण्यासाठी रांगा लावू नका. एखादा मोठा शेअर काही दिवसात किंवा काही आठवड्यात २० ते २५% इतकासुद्धा वाढू शकतो मात्र अशा वेळी तो खरेदी केला तर एखादी वाईट बातमी किंवा छोटी मंदी सुद्धा तुम्हाला मोठे नुकसान सोसण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. अस्थिर शेअर्सच्या बाबतीत हि जोखीम तर जास्तच वाढते.
बाजारातून सावधगिरीचे संकेत
शेअर बाजारातील पूर्वेतिहास पाहता बाजारातील सावधगिरीचे संकेत काही घटनांतून मिळू शकतात. ते कसे ते आता पाहूया. जेव्हा सगळेच गुंतवणूकदार शेअरबाजारात शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा बाजारात तेजीचा कल दिसून येत असतो. अशावेळी ज्यांनी पूर्वी शेअर्स खरेदी केलेले असतात ते त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या किंमती आणखीन वाढण्यासाठी वाट पहात असतात. अशावेळी अन्य लोकांनीसुद्धा त्यांनी घेतलेला शेअर घ्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. बरेचसे गुंतवणूकदार त्यांच्याकडे असणारे सारे पैसे एकदम गुंतवून मोकळे झालेले असतात. जोपर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सातत्याने गुंतवणुकीचा ओघ सुरु असतो तोपर्यंत सर्व काही आलबेल असते. यावेळी आपण बाजरात नेहमी लक्ष ठेवून राहिले पाहिजे, जेव्हा हा बाजारात सतत येणाऱ्या पैशांचा ओघ कमी होऊ लागतो तेव्हा बाजारातील खरेदी कमी होऊ लागते. यावेळी आपण गुंतवलेले पैसे शेअर्सची विक्री करून बाजारातून काढून घेणे इष्ट असते.
दुसरे म्हणजे आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती: जेव्हा आर्थिक क्षेत्रात चोहोबाजूनी अस्थिरता असते, मंदीची चाहूल दिसू लागते किंवा देशात जर राजकीय अस्थिरता असेल तर तेव्हा बाजारात एकदम विक्रीचा जोर वाढू लागतो. हा बाजारात बाजारात मोठी मंदी येण्याचा संकेत असू शकतो.
तिसरे म्हणजे, जेव्हा सतत शेअरच्या किंमती वाढत असतात व रोज नवे नवे उच्यांक होत असतात तेव्हा समजावे हे फार काळ टिकू शकणार नाही. मुख्यत्वेकरून आयटी शेअर्सच्या बाबतीत हे जास्त वेळा घडून येत असते. अशावेळी संबंधित शेअर्सच्या किंमती या त्या शेअर्सपासून मिळणाऱ्या उपनांच्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढत असतात. हि धोक्याची घंटा समजली पाहिजे. कारण जेव्हा वाजवीपेक्षा शेअरची किंमत वाढू लागते तेव्हा समजावे काहीतरी घोळ आहे.
चवथे म्हणजे, बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ चा भडीमार होतो. कारण जेव्हा बाजरात मोठी तेजी असते तेव्हा गुंतवणूकदारांकडून आयपीओ आणून भांडवल उभे करणे सोपे असते. यावेळी रोजच बाजार नवीन नवीन विक्रम करत असतो. बाजारात येणाऱ्या जवळपास सर्वच आयपीओना तुफानी प्रतिसाद मिळत असतो. अनेक पटीने आयपीओमध्ये गन तवणूक केली जात असते. हीसुद्धा धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ येऊ लागले कि नंतर मंदी येणार असे समजून जावे.
पाचवे म्हणजे, जेव्हा एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करू लागतात तेव्हा बाजारावर मंदीचे ढग जमू लागले आहेत हे समजावे.
सहावे म्हणजे, जेव्हा मंदीच्या शेवटाला एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी करू लागले कि समजावे बाजारात मोठी तेजी येणार आहे.
- Published in Capital Market
११. काही महत्वाच्या टिप्स
११. काही महत्वाच्या टिप्स
शेअरबाजारा संबंधी काही महत्वाच्या टिप्स
- नवीन उत्पादन (प्रॉडक्ट), सेवा (सर्व्हिस) किंवा नेतृत्व (लीडरशिप). जर एखादी कंपनी एखादे अगदी नवीन उतपादन किंवा सेवा बाजारात आणत असेल किंवा एखादी अशी नवीन कल्पना ज्यामुळे अर्थव्यवस्थेत त्या कल्पनेमुळे हलचल निर्माण होणार अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर याचा त्या कम्पनीच्या बाजारातील शेअरच्या किंमतीवर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- एखाद्या क्षेत्रातील अग्रगण्य स्टॉक. ज्यावेळी एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण संख्येपैकी जवळपास ५०% कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढत असतात. अशा वेळी त्या क्षेत्रातिल आघाडीच्या कंपनीच्या कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि यातील काही चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजेत. अशा वेळी त्या क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी असल्याचे पाहून तुम्हाला ते शेअर्स खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो मात्र तो मोह टाळला पाहिजे आणि चांगली कामगीरी करणाऱ्या कंपन्यांचेच शेअर्स खरेदी केले पाहिजेत.
- उत्तम दर्जाच्या संस्थात्मक कंपन्यांनी प्रायोजित केलेले शेअर्स. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक असे असले पाहिजेत कि जे काही महत्वाच्या म्युच्युअल फंड योजनेत घेतलेले असतात. कारण असे शेअर्स हे बाजाराची वरची दिशा दाखवण्यासाठी समर्थ असतात
- नवीन उच्चांक. ज्या शेअर्सच्या किंमती उलाढालीतील वाढीसह नवीन नवीन उच्चांक करत असतात ते आणखीन वाढण्याचाच जास्त संभव असतो.
- काही असामान्य स्टॉक त्यांच्या किंमतीचे सूत्र बळकट करत असतात आणि त्यानंतर ते त्यांची कामगिरी उंचावत असतात. मात्र यावेळी त्या शेअर्सच्या खरेदी व विक्रीतील उलाढाल सुद्धा सतत वाढत असली पाहिजे.
- साकारात्मक बाजार. या काळात तुम्ही नेहमी चांगली कामगिरी करणारे शेअर्सच खरेदी केले पाहिजेत. परंतु जर बाजारात एकूणच मंदी असेल तर तुम्ही घेतलेल्या शेअर्सच्या किंमती सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. म्हणून बाजारातील चांगले शेअर्स तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. यासाठी आम्ही बाजारातील कल ओळख हा लेख लिहिला आहे तो समजून घेतला पाहिजे.
- एक लक्षात ठेवा कि जर एखादा शेअर २५% खाली आला तर तो तेथून ३३% वाढल्यावरच फायद्यात येऊ शकतो आणि जर एखाद्या शेअरची किंमत ५०% कमी झालेली असेल तर तो १००% वाढल्यावरच परत फायद्यात येत असतो.
- Published in Capital Market
१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही
१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही
नियमितपणे गुंतवणूक करत रहा, घाबरून जाऊ नका
माझ्याकडून हीच सर्वात चांगली टीप तुमच्यासाठी आहे. शेअर्स निवडताना काळजी घ्या, पण एकदा का तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक खरेदी केलात आणि काही कारणाने जर शेअर बाजार खाली आला किंवा गडगडला आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर घाबरून जाऊन तो शेअर विकून मोकळे होऊ नका तर अशा वेळी नियमितपणे जमतील तेव्हढे जास्तीचे शेअर्स खरेदी करा. शेअर खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कि नेहमी चांगल्या कंपनीचेच शेअर्स विकत घ्या ती कंपनी काय निर्माण करते त्याची माहिती घ्या. कंपनी सुरु करणारी व्यक्ती कोण आहे, तिचा पूर्वेतिहास काय आहे. कंपनीचे व्यवस्थापन पारदर्शक आहे का, कंपनीची विक्री प्रत्येक वर्षी वाढणारी आहे कि नाही, बाजारात कंपनीची प्रतिष्ठा काय आहे, पीई नेहमी वाढणारा आहे का इ. कंपनी संबंधित माहिती करून घेऊन शेअर्स खरेदीचा निर्णय घ्या. एकदा शेअर्स खरेदी करून झाले आणि जर त्याची बाजारातील किंमत कमी झाली तरी घाबरून जाऊ नका कारण शेअर्सच्या मूल्यातील चढ उतार हा शेअर बाजाराचा स्थायी भाव आहे.
शेअरची किंमत कमी किंवा जास्त झाली तरी कंपनी आपले कामकाज चालूच ठेवत असते. जोपर्यंत कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या मालकीचे शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. हा मात्र जर तुम्ही छोट्या आकाराच्या कंपनीचे शेअर्स घेतलेले असतील तर मात्र त्यांचा शेअर्सचा कमी झालेला भाव परत वाढेल कि नाही हे सांगणे अवघड असते. अनेकवेळा शेअर्सच्या किंमती कमी होण्याचे कारण हे भावनेवर आधारित असते आणि असे झाल्यास तो परिणाम तात्पुरता असतो. जर तुम्ही घेतलेल्या शेअर्सची किंमत कमी झाली तर खालील गोष्टी तपासा:
१) शेअर्सची किंमत अचानकपणे कमी होण्याचे कारण काय आहे? त्या कंपनी बाबत काही अफवा पसरली आहे काय? जर अफवा पसरली असेल तर त्याबाबत कंपनीचा खुलासा काय आलेला आहे ते तपासा.
२) स्टोकनी किंमत कमी झाल्यानंतर त्याबाबत कंपनीचे काही म्हणणे आहे का ते तपासा.
३) त्या कंपनीत काम करणारे अधिकारी शेअर्स खरेदी किंवा विक्री करत आहेत काय?
४) किंमत कमी झालेली असताना कंपनी शेअर्सची पुनर्खरेदी करत आहे काय?
जर कंपनी देत असलेला खुलासा तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही समभागांच्या घसरलेल्या किंमतीकडे दुर्लक्ष करणे हेच तुमच्या हिताचे असेल. मात्र काही योग्य कारणामुळे जर शेअर्सचा भाव पडलेला असेल व तो आणखीन खाली जाण्याची शक्यता असेल तर मात्र तुम्ही तो शेअर नुकसानीत सुद्धा विकून आलेल्या पैशातून अन्य चांगल्या कंपनीचा शेअर विकत घेण्याचा विचार केला पाहिजे. मात्र तुमचा कोण्तायी निर्णय हा कंपनी संबधीचा असला पाहिजे आणि तो शेअर्सच्या किंमतीशी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर स्टॉकची किंमत कमी येण्याचे कारण कंपनीच्या उलाढालीशी, नफा कमी होण्याशी निगडित नसेल तर ती किंमत परत वर जाऊ शकेल, आणि मग तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
नेहमीच चांगल्या कंपनीचेच शेअर्स खरेदी करा:
बरेचवेळा शेअरबाजारात नवीनच गुंतवणूक करणारी व्यक्ती लवकरात लवकर जास्त पैसे मिळवावेत अशा मानसिकतेची असते. जर तुम्ही नशीबवान असाल तर असे कदाचित घडलंही. परंतु खरे पाहता तेच गुंतवणूकदार श्रीमंत होतात जे चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून ते दीर्घ मुदतीसाठी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगून ठेवतात. बरेच लोकं कोणता शेअर स्वस्त आहे असे विचारत असतात. याचे एक कारण असते ते म्हणजे त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसतात मात्र त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये हजारो शेअर्स असावेत असे वाटत असते ज्यायोगे जेव्हा त्या शेअरची किंमत वाढेल तेव्हा त्यांना असे वाटते कीं आपल्याला भरपूर पैसे मिळतील. पण समस्या अशी असते कि असे स्वस्त असणाऱ्या शेअर्सची किंमत कधी वाढतच नाही. आणि यदाकदाचित थोडी वाढली तरी ते विकले जातच नाहीत कारण ते खरेदी करायला कोणीच तयार नसते.
समजा तुमच्याकडे रु.१०००० आहेत व त्यातून हजारो कमी किंमतीचे शेअर्स घेण्याऐवजी तुम्ही जर एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत तर भविष्यात त्याचे बरेच पैसे होऊ शकतात. याचे एक उदाहरण म्हणजे जर का तुम्ही रु.१०००० चे Infosys चे शेअर्स १९९१ साली खरेदी केले असतेत आणि आजपर्यंत बाळगून ठेवले असतेत तर आज मिळालेले बोनस शेअर्स अधिक स्प्लिट मुळे तुमच्याकडे हजारो शेअर्स झाले असते व आज त्याचे मूल्य काही कोटी रुपये झाले असते.
अर्थात मागील काळात ज्या कंपनीच्या शेअर्सनी असाधारण कामगिरी केली आहे हे समजणे फारच सोपे असते पण असे कोणते शेअर्स भविष्यात भरघोस प्राप्ती करून देऊ शकतील हे सांगणे मात्र कठीण काम असते. म्हणून सर्वात चांगली गोष्ट हि आहे कि तुम्ही एखाद्या तुम्हाला माहित असलेल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि विसरून जा. यामुळे काय होईल कि सुरुवातीला शेअर्स खरेदी करताना फक्त तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागेल आणि जर तुम्ही घेतलेले शेअर्स जर चालल्या कंपनीचे असतील तर ते भविष्यात चांगली कामगिरी करतीलच आणि जर ते अशी चांगली कामगिरी करत असतील तर ते विकण्याचा विचार तरी का करावयाचा बरे?
तुमच्याकडे असणाऱ्या रु.१०००० चे अनेक स्टॉक घेण्याच्या ऐवजी जरी एखाद्या चांगल्या कंपनीचा उदा. मारुती लिमिटेड चा जरी एक शेअर घेऊन ठेवलात आणि परत तुमच्या कडे जेव्हा पैसे जमतील तेव्हा परत एक जास्तीचा शेअर घेतलात असे दीर्घ मुदतीत करत राहिलात तर २०-२५ वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटीने वाढलेले तुम्हाला दिसून येईल. मारुती हे एक उदाहरण म्हणून सांगितले आहे, देशांत जवळपास २५० चांगल्या कंपन्या आहेत त्यातील तुम्हाला जी माहित असेल अशा कंपनीच्या शेअर्सची तुम्ही नियमितपणे खरेदी करू शकता.
तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये किती कंपन्यांचे शेअर्स असावेत
अनेक कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा काही थोड्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये धारण करणे हे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवणे सोपे होते. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पैशांप्रमाणात किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत हे खालील टेबल मध्ये मार्गदर्शन म्हणून पहा:
असणारी रक्कम | किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत |
रु. २०००० पेक्षा कमी | १ ते २ |
रु. २०००० ते ५०००० | २ ते ३ |
रु. ५०००० ते २००००० | ३ ते ५ |
रु. २००००० ते ५००००० | ५ ते ७ |
रु. ५००००० पेक्षा जास्त | ७ ते १० |
- Published in Capital Market
९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण
९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण
प्रामुख्याने शेअर्स विकत घेताना तीन उद्देश असतात म्हणून शेअर्सचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते ते असे Value (मूल्य), Growth (वाढ), Income (उत्पन्न) आणि यावर आधारित त्यांचे विश्लेषण केले जाते.
Growth Stocks (वृद्धी स्टॉक):
या प्रकारातील शेअर्स खरेदी करताना अशा कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात कि ज्या कंपन्यांची विक्री नियमितपणे वाढत रहाण्याची शक्यता असते आणि प्रति शेअर उत्पन्न वाढत असते अश्या कंपनीचे शेअर्स ग्रोथ स्टॉक म्हणून समजले जातात. ह्या प्रकारातील कंपन्या या अन्य कंपन्यांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत असतात किंवा त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेतही जास्त वेगाने वाढत असतात. या प्रकारातील कंपन्या अतिशय कमी लाभांश देतात किंवा अजिबात देत सुद्धा नाहीत कारण या कंपन्या असा लाभांश देण्यापेक्षा तो पैसा परत व्यवसायात गुंतवणे पसंत करत असतात. आणि म्हणून ज्या लोकांना अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असेल त्यांनी ती अनेक वर्षांसाठी करण्याची तयारी असेल तरच करावी. कंपनीची निवड करताना त्या कंपनीचे व्यवस्थापन चांगले नामांकित असले पाहिजे. HLL, Nestle, Infosys, Wipro अशा काही नामांकित कंपन्या या प्रकारात गणल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी गेली वर्ष-नु- वर्षे अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी नोंदवलेली आहे व गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करून दिलेली आहे. अनेक मोठे गुंतवणूकदार अशा कंपनीत केलेली गुंतवणूक कधी काढत नसतात.
Value Stocks (लपलेले मूल्य असणारे शेअर्स)
बाजारात अशा काही कंपन्या असतात ज्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य काही तात्पुरत्या कारणाने कमी झालेले असते किंवा त्यांच्याकडे अन्य गुंतवणुकदारांचे दुर्लक्ष झालेले असते मात्र अशा कंपन्यांकडे एक “लपलेले मूल्य” (hidden value) असते. अशा कंपन्यांच्या स्टॉकचे मूल्य काही खराब/वाईट बातमीमुळे बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असते. जरी अशा कंपन्यांचे शेअर्सचे बाजार मूल्य कमी झालेले असले तरी त्यांचा व्यवसाय नीटपणे चालू असतो. पूर्वीची कामगिरी चांगली असते. त्या कंपन्यांच्या मालकीची मोठी मालमत्ता, मोक्याच्या ठिकाणी जमीन, इमारत असते, तसेच मोठ्या प्रमाणावर स्टॉक असतो किंवा त्या कंपनीच्या अन्य सहयोगी कंपन्या असतात ज्या उत्तम कामगिरी करत असतात, ज्यामध्ये या कंपनीची शेअर्स मध्ये गुंतवणूक असते. या सर्वांचे मिळून एक चांगले मूल्य असते मात्र ते शेअर्सच्या किंमती मध्ये दिसत नसते. यामुळेच काही हुशार गुंतवणूकदार तसे लपलेले मूल्य असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स त्याची किंमत कमी झालेली असताना खरेदी करतात आणि बाजाराला त्या कंपनीचे खरे मूल्य समजून येऊन परत शेअर्सची किंमत वाढेपर्यंत ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेऊन देत असतात. व्हॅल्यू स्टॉक हे असे स्टॉक असतात कीं ज्यांचे मूल्य त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी झालेले असते आणि त्यांचे मूल्य पुढील काही काळात एखादी चांगली बातमी आली कि मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते. अर्थात जरी या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी झालेल्या असल्या तरी या कंपन्यांचे मूलभूत मूल्य हे मजबूतच असते. हे ठरवताना काही गोष्टी आवर्जून पहिल्या जातात त्या म्हणजे त्यांचा पीइ रेशो हा त्याच्या उच्चतम पातळी पासून किती खाली आलेला आहे, लाभांशाचे उत्पन्न तुलनेने किती प्रमाणात वाढलेले आहे, कंपनीची विक्री पातळी किती प्रमाणात वर खाली झालेली आहे या गोष्टी व्हॅल्यू स्टॉक खरेदी करताना पहिल्या जातात. फ्रँकलिन म्युच्युअल फंड हे धोरण राबवण्यात प्रसिद्ध आहे.
अनेकवेळा ग्रोथ स्टॉक हे सुद्धा काही काळासाठी व्हॅल्यू स्टॉक मध्ये परावर्तित होत असतात.
Income (लाभांश देणारे शेअर्स)शेअर्स खरेदी करताना मुख्य उद्देश हा शेअर्सचे भाव वाढावेत हा असतो. मात्र काही गुंतवणूकदार हे त्यापासून मिळणारा लाभांशचे उत्पन्न मिळावे म्हणून शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात. असे गुंतवणूकदार अशा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात कि ज्या कंपन्या नियमितपणे जास्त लाभांश देत असतात, त्या साठी त्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीं जरी जास्त वाढ झाली नाही तरी त्याची त्यांना पर्वा नसते. नियमितपणे जास्त लाभांश मिळावा हाच त्यांचा उद्देश असतो. असे जास्त लाभांश देणारे स्टॉकस हे इन्कम स्टॉक म्हणून समजले जातात. ज्या क्षेत्रातील कंपन्यांची वाढ हि कमी प्रमाणात होत असते अशा कंपन्या मुख्यत्वेकरून जास्त प्रमाणात लाभांश देत असतात.
- Published in Capital Market
८. फंडामेंटल विश्लेषण
८. फंडामेंटल विश्लेषण
फंडामेंटल विश्लेषण मध्ये सुट्टयाला स्थान नसते हे शास्त्र पारंपरिक मुलभुत विश्लेषणावर आधारित असते. फंडामेंटल विश्लेषणावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती कधीही दलाल स्ट्रीटवर घडणाऱ्या बारीक सारीक घटनांकडे सरळ दुर्लक्ष करत असतात त्याला कोणतेही महत्व देत नाहीत. कारण खालील तीन मूलभूत घटकांकडे विश्लेषण करत असताना पाहत असतात:
अर्थव्यवस्था
उद्योग क्षेत्र
कंपनी
उपरोक्त तिन्ही आयामांची एकत्रितपणे तुलना करणे आवश्यक आहे कारण या तिन्ही घटकांना तितकेच महत्व असल्यामुळे यातील कोणताही एक घटक वगळून फंडामेंटल विश्लेषण करताच येणार नाही. या विभागात आम्ही आपणास या प्रत्येक घटकाची थोडक्यात माहिती देण्याचा येथे प्रयत्न करत आहोत.
अर्थव्यवस्थेचे विश्लेषण
खालील टेबल मध्ये काही आर्थिक निर्देशक दिलेले आहेत आणि त्यांचा स्टॉक मार्केटवर काय परिणाम होतो ते दुसऱ्या रकान्यात दिलेले आहे.
Sr.No. | आर्थिक निर्देशक | स्टॉक मार्केटवरील परिणाम |
१ | GNP मध्ये वाढ घट | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
२ | किंमत स्थिती (महागाईचा दर) स्थिर वाढणारा | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
३ | अर्थव्यवस्थेत तेजी मंदी | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
४ | बांधकाम क्षेत्रातील हालचाल व मागणी या क्षेत्रातील वाढती मागणी या क्षेत्रातील कमी किंवा घटती मागणी | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
५ | रोजगार निर्मिती वाढ होणारा कालखंड कमी होणारा कालखंड | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
६ | मालाची साठेबाजी महागाई वाढत असताना मंदीचा कालखंड लांबत असताना | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
७ | खर्च करण्यासाठी उपलब्ध असणारे उत्पन्न वाढत राहणारे कमी होत राहणारे | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
८ | वैयक्तित बचतीत होणारी वृद्धी घट | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
९ | व्याज दारात होणारी घट वाढ | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
१० | व्यापाराचा समतोल सकारात्मक नकारात्मक | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
११ | चलन बाजारात रुपयाची ताकद मजबूत कमजोर | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
१२ | कॉर्पोरेट कर आकारणी कमी जास्त | सकारत्मक – चांगला नकारात्मक – वाईट |
उद्योगा संबंधित विश्लेषण
प्रत्येक उद्योग क्षेत्राला ४ प्रमुख जीवन चक्रातून मार्गक्रमण करावे लागते
१) सुरुवातीचा काळ
२) वाढीचा किंवा फैलाव होण्याचा कालखंड
३) स्थैर्याचा (परिपक्व) कालखंड
४) उतरती (अधोगती) कळा
प्रत्येक उद्योगासाठी हे गतिशील (डायनॅमिक) कालखंड असतात. प्रत्येकाने गुंतवणुकीचा निर्णय करताना शक्यतो उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात आणि ते न जमल्यास वाढीच्या किंवा फैलाव होण्याच्या (ग्रोथ) कालखंडात गुंतवणूक करावी. आणि जेव्हा परिपक्व किंवा स्थैर्याचा कालखंड असतो तेव्हा आपल्या कडील शेअर्स विकून मोकळे व्हावे. विक्री, नफाक्षमता आणि वृद्धी दर कसा आहे हे तपासले कि सध्या उद्योग जगत कोणत्या कालखंडातून जात आहे हे समजून घेता येते.
उदाहरणार्थ १९८० ते १९९० हे दशक आयटी उद्योगाचा सुरुवातीचा कालखंड होता
१९९१-२००० या कालखंडात आयटी उद्योगाची वेगाने वाटचाल चालू होती व या काळात कंपन्यांच्या मोठी वाढ झाली
वर्ष २००१ पासूनचा कालखंड हा आयटी कंपन्यांच्या स्थैर्याचा मानता येईल
म्हणून ज्यांनी १९८० ते २००० या कालखंडात आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्यांना सर्वाधिक फायदा झाला.
कंपनीचे विश्लेषण
काही वेळा अशीही परिस्थिती असते कि औद्योगिक क्षेत्र आकर्षक कामगिरी करत असते मात्र त्या क्षेत्रातील काही कंपन्या मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयशी होत असतात; त्याचप्रमाणे असेही असू शकते कि एखाद दुसरी कंपनी एकूण संबंधित उद्योग क्षेत्रापेक्षा जास्त भरीव कामगिरी दाखवत असतात, जेव्हा त्या क्षेत्रातील अन्य कंपन्या मात्र खराब कामगिरी करत असतात. म्हणूनच तुम्ही एक गुंतवणूकदार म्हणून कंपनीचे योग्य विश्लेषण करण्यासाठी त्या कंपनीची आर्थिक तसेच अन्य सारे घटकांचा समतोलपणे विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय केला पाहिजे. आणि यासाठी महत्वाचे काही घटक खालीलप्रमाणे:
१) कंपनीचा इतिहास आणि व्यवसायाचे स्वरूप काय आहे.
२) कंपनी उत्पादित करीत असलेल्या वस्तू/सेवांची बाजारातील मागणी/पुरवठा यांची ताकद
३) कंपनीचा बाजारातील हिस्सा
४) व्यवस्थापकीय संचालक मंडळात कोण व्यक्ती आहेत
५) पेटन्ट आणि ट्रेडमार्क्स यांचे अंतर्गत व व्यावसायिक मूल्य काय आहे
६) परदेशी सहयोग, भविष्यासाठी त्याची गरज आणि उपलब्धता
७) बाजारात, वर्तमान आणि भविष्यातील स्पर्धात्मक गुणवत्ता
८) भविष्यातील व्यवसायाची योजना आणि प्रकल्प
९) कंपनीची ओळख: ब्लू चिप आहे का, भांडवली आकार: मोठा, माध्यम कि लहान
१०) कंपनीच्या शेअर्सची बाजारातील उलाढाल
११) प्रति शेअर उत्पन्न, त्यात किती वाढ वार्षिक स्वरूपात होत आहे
१२) विक्री मधील वार्षिक वाढ किती आहे आणि लाभांश नियमितपणे दिला जातो का हे पहिले पाहिजे
- Published in Capital Market
७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
प्रकरण ७ वे
७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते. विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.
पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो):
हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.
पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न
उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी
कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी
म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१००
कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर
पीएसआर = ७५/१००
= ०.७५
रिटर्न ऑन इक्वीटी:
याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा.
Return on Equity = Net Income/Shareholder’s Equity
डेब्ट – इक्वीटी रेशो:
हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा जास्त असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.
बेटा:
इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो,
https://www.bseindia.com/indices/betavalues.aspx या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.
प्रतीशेअर उत्पन्न(Earning per share – EPS)
याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.
पी / इ रेशो
कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो.
रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.
मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे.
रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे त्याबाबत आपण पुढील प्रकरणात चर्चा करुया.
- Published in Capital Market
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
प्रकरण ६ वे
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय?
होय, निश्र्चितच होऊ शकतो.
लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हि गोष्ट खरीच आहे, अशावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हेच तुमच्यासाठी योग्य होईल कारण तज्ञ फंड मँनेजर तुमच्यावतीने तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतो, मात्र त्याच्यावर काही बंधने असतात, त्यातील महत्वाचे म्हणजे योजनेच्या उदिष्ठांनुसारच त्याला गुंतवणूक व्यवस्थापन करावे लागते, म्हणूनच म्युच्युअल फंडाची योजना निवडताना तिचे उदिष्ठ व मागील कामगीरी तपासून पहा. यासाठी चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्या.
मात्र जर तुम्ही स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यास वेळ देऊ शकत असाल तर तुम्हीच तज्ञाप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तुम्ही हे निश्र्चितच करु शकता. त्यासाठी ह्या लेखातील व या पुढे मी देत असलेले लेख काळजीपुर्वक वाचा व त्याचा उपयोग तुमच्या गुंतवणूक व्यवस्थापनासाठी करा. प्रथमत: तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु इच्छित आहात त्याची माहिती नीट होण्यासाठी खालील बाबी कशा तपासाव्या हे मी तुम्हाला प्रथम सांगतो.
विक्रीतील वाढ
कंपनीची विक्रीत दर वर्षी होणारी वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. मागील वर्षापेक्षा किती टक्के विक्री वाढली आहे हे तपासा. नियमीत वाढ हे कंपनीच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जर विक्रीत घट झाली असेल तर त्याचे कारण तपासा, हा बदल तात्पुरता आहे कि दिर्घकाळ परिणाम करणारा आहे याची माहीती घ्या. विक्रीत होणा-या वाढीचा दर हा प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळा असू शकतो उदा. एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्याच्या विक्रीची वाढ हि १०% दराने साधारणपणे होत असल्यास चांगली समजली जाते तर आयटी कंपनीची वाढ हि २०% पेक्षा जास्त असणे चांगले समजले जाते. हा निकष प्रत्येक सेक्टरसाठी वेग-वेगळा असतो. विक्रीच्या वाढ/घटीचा परिणाम शेअर्सच्या किंमती कमी/जास्त होण्याशी असतो. अपवाद बाजारातील तात्तपुर्ती तेजी/मंदी. नेहमी विक्रीत वाढ होणारी कंपनी तुम्हाला दिर्घकाळात तुमच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकते. मात्र विक्रीतील वाढ एवढा एकच निकष पुरेसा नाही अन्य गोष्टी सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आता एक एक करुन पाहुया.
बॉटम लाईन ग्रोथ
बॉटम लाईन ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या निव्वळ (नेट) नफ्यात होणारी वाढ. निव्वळ नफ्यात नियमीतपणे होणारी वाढ कंपनीची प्रगती दाखवते व याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्यात होतो. नफ्यातील वाढ हिसुध्दा सेक्टरनुसार वेगवेगळी असते. उदा. आयटी सेक्टरमधील चांगल्या कंपनीच्या नफ्यातील वाढ हि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ ते ७०% असू शकते तर एफएमसीजी व जुन्या कंपन्यांच्या बाबत हि वाढ १० ते १५% सुध्दा चांगली मानली जाते.
आरओआय – रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूकीवरील परतावा:
म्हणजेच कंपनीने गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात किती परतावा मिळाला हे पहाणे. जर का एखाद्या कंपनीने रु.१०० कोटी मशिनरी, जमीन,मनुष्यबळ व अन्यत्र भांडवली गुंतवणूक केलेली असेल व जर त्या कंपनीला निव्वळ नफा रु.२५ कोटी वर्षात झालेला असेल तर आरओआय होईल २५%. परत आरओआय हा सुध्दा कंपनीच्या प्रकारावर पाहिला पाहिजे. आयटीसाठी तो ३५ ते ४० टक्के चांगला असेल तर भांडवली पीएसयुसाठी तो १० ते १५% चांगला समजला जातो.
व्हॉल्युम (उलाढाल):
काही तज्ञ कंपनीच्या शेअर्सच्या बाजारातील होणा-या रोजच्या रोजच्या व वर्षातील दररोजच्या सरासरी उलाढालीला महत्व देतात. यामुळे असे कळते कि त्या कंपनीच्या शेअर्सची रोज खरेदी विक्री किती संखेत होते. जर कंपनीच्या संबंधी एखादी महत्वाची बातमी बाजारात येते तेव्हा अचानकपणे त्या कंपनीच्या शेअर्सची उलाढाल वाढते कारण मागणी एकतर चांगली बातमी असली तर वाढते व वाईट बातमी असेल तर मागणी कमी होते व याचा परिणाम शेअरच्या किंमतीत होणा-या वाढ-घटीवर होतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या संखेने हेही समजते कि त्या शेअरची तरलता किती आहे. ज्या शेअरची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असे शेअर विकणेही सुलभ असते (कारण गि-हाईक समोर असते) तसेच यांच्या खरेदीवर होणारा खर्चही अल्प असतो. याच्या उलट ज्या शेअर्सची कमी किंवा क्वचीतच उलाढाल होते अशा शेअर्सच्या किंमतीत होणारा बदलही मोठा असतो म्हणून अश्या शेअर्सच्या शक्यतो वाटेलाच जाऊ नये. उलाढालीमुळे शेअर्सच्या मागणी व पुरवठ्याचीसुध्दा कल्पना येते ज्यामुळे किंमत कमी होणार आहे कि वाढणार आहे याचा प्राथमीक अंदाज येतो. जेव्हा अचानकपणे एखाद्या शेअरची किंमत वाढू लागली कि त्याचे कारण तपासले पाहिजे, एक कारण असे असू शकते कि कोणतातरी संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी करु लागला असेल. तसेच किंमत कमी होण्याचे कारण याच्या उलट असते, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतात.
मार्केट कँपिटलाझेशन (भांडवली बाजार मुल्य)
कंपनीच्या सर्व मिळून शेअर्सचे होणारे त्या वेळचे बाजार मुल्य (एकूण शेअर्स गुणीले प्रती शेअरचा दर). यामुळे कंपनी मोठी, मध्यम कि लहान आहे हे कळते. तसेच त्या शेअरची तरलतासुध्दा यामुळे अजमावता येते, जेवढे भांडवली बाजार मुल्य जास्त तेवढी तरलता जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला जर नियमीत व स्थिर परतावे मिळावे असे वाटत असेल म्हणजेचे तुलनेत कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर ज्या कंपनीचे भांडवली बाजार मुल्य सर्वात जास्त आहे अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, जर मध्यम जोखीम घ्यावयाची असेल तर मध्यम आकाराच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व जर जास्तच जोखीम घ्याव्याची असेल तर लहान कंपन्याचे शेअर्स घ्यावेत. म्हणजेच भांडवली बाजारमुल्य आपणास शेअर खरेदी करताना आपली जोखीम ठरविण्यास मदत करते.
कंपनी व्यवस्थापन
खरे पहाता कंपनीचे व्यवस्थापन कोणत्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हाती आहे हे पहाणे सर्वात महत्वाचे असते. यामुळे या व्यवस्थापनाच्या अन्य कंपन्या असल्यास त्यांची कामगिरी तुलनेसाठी फारच उपयुक्त ठरते. कंपनीचे व्यवहार किती पारदर्शक आहेत हे त्या कंपनीच्या व्यवस्थापनावरुनच समजते. त्यांची कंपनीकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे हेही फार महत्वाचे असते. म्हणूनच टाटा, बिर्ला, या समुहाला सर्वमान्यता जास्त असते. कंपनी कशी चालवावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री. नारायण मुर्ती यानी चालवलेली इन्फोसीस हि कंपनी व व्यवस्थापन कसे नसावे याचे उदा. सत्यम कंपनी (आता ती महिंद्र गृपने घेतल्याने जुन्या भागधारकाना दिलासा मिळाला हि गोष्ट वेगळी). कंपनी कामगिरी कशी करणार हे पुर्णत: व्यवस्थापनावरच अवलंबून असते. जर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणा-या व्यक्ती या कार्यकुशल, प्रामाणिक व विश्वासार्ह असतील व ते जर अन्य चांगल्या कार्यरत असणा-या कंपनीच्या व्यवस्थापनेचा भाग असतील तर अशा कंपनीला मोठे गुंतवणूकदार नेहमीच प्राधान्य देत असतात. तसेच कंपनीचा एमडी कोण आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. यामुळेच आपण शेअर्स खरेदी करताना व्यवस्थापन कोणाचे आहे याला प्राधान्य दिले पाहिजे.
आता पुढील प्रकरणात आपण महत्वाचे रेशो कसे पहावेत याची माहिती घेऊ.
- Published in Capital Market
५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा
प्रकरण ५ वे
५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा
गुंतवणूकीचे उदिष्ठ
ज्या गुंतवणूकीमधून दिर्घ मुदतीत चांगला परतवा मिळेल अशा गुंतवणूकीच्या साधनाची निवड अत्यंत काळजीपुर्वक केली पाहिजे. अल्प काळाचा विचार गुंतवणूक करताना करणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. मुख्यत्वेकरुन जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही दिर्घ काळाचाच विचार करणे तुमच्या हिताचे होईल. शेअर बाजारात नेहमीच शेअर्सच्या किंमती अत्यंत वेगाने वर खाली होत असतात. सुरुवात करताना किमान ३ ते ५ वर्षाचे उदिष्ठ ठेऊन गुंतवणूकीची सुरुवात करा. त्यासाठी प्रथमत: तुम्ही स्वत:लाच ओळखण्यास सुरुवात करा.
तुम्ही तुमच्या गुंतवणूकीपासून काय मिळवू इच्छित आहात?
नियमीत उत्पन्न, मुद्दलात वाढ कि दोन्ही गोष्टी मिळवू इच्छीत आहात हे ठरवा.
आता तुम्ही किती जोखीम स्विकारण्यासाठी तयार आहात?
प्रत्येकाची जोखीम स्विकारण्याची मानसीकता सारखी असू शकत नाही त्यामुळे काही व्यक्ती बाजारात गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झाले तर लगेच शेअर्स विकून बाजाराला राम राम करतात, यामध्ये अनैसर्गीक असे काहीच नाही. मात्र अशी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाने शेअरबाजारात गुंतवणूक न करणेच इष्ट असते. कोणत्याही व्यवसायात नफा व नुकसान हे होतच असतेच. जेथे जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते तेथे नुकसानही जास्तच होऊ शकते. शेअर बाजाराचा दोनशे वर्षाचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते कि अनेकवेळा शेअर बाजार ६०% पेक्षा जास्त कोसळलेला आहे हि जशी वस्तुस्थीती आहे त्याचप्रमाणे ज्यानी ज्यानी चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक केली आहे त्या सर्वानाच अतिशय उत्तम फायदा झालेला आहे. म्हणूनच शेअर बाजारात तुम्हाला उतरावयाचे असेल तर तुम्ही दिर्घकाळासाठीच गुंतवणूक करणे व ती नियमीतपणे करणे हेच अंतीमत: योग्य ठरु शकते. तुम्हाला माहित असेलच कि बेंजामीन ग्राहम व वॉरेन बफेट सारख्या यशस्वी गुंतवणूकदारानी शेअर बाजारातून अमाप उत्पन्न मिळवले पण त्यानी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये बदल झाला तरच त्यांची त्या कंपनीतील गुंतवणूक काढून त्यांच्या पोर्टफोलीओमध्ये बदल केलेला आहे. जर का तुम्हाला एकदा हे समजले कि आपल्याला आपल्या गुंतवणूकीपासून किती फायदा होऊ शकतो तरच काही तासात, दिवसात, आठवड्यात, माहिन्यात किंवा अगदी २ ते ३ वर्षातसुध्दा तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत कमी अथवा जास्त झाली तरी तुम्ही विचलीत होणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरुवात करताना म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेपासून सुरुवात करणे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन तज्ञ व्यक्तींव्दारे केले जाण्याची सुवीधा मिळते. जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनानी गेल्या २५ वर्षात वार्षीक सरासरी १५% ते ३०% परतावा तोही चक्रवाढ पध्दतीने दिलेला आहे. परत यात आपल्याला काही व्यवस्थापन करावे लागत नाही. तुमचा गुंतवणूक सल्लागार यासाठी म्युच्युअल फंडाची चांगली योजना निवडण्यास मदत करत असतो. मात्र जर का बाजारातील चढ-उतार, अस्थीरता या गोष्टींचे तुम्हाला वावडे असेल तर तुम्ही निश्र्चित उत्पन्न साधनात गुंतवणूक करणेच योग्य होईल.
आर्थीक नियोजन व उदिष्ठ ठरवीणे:
गुंतवणूकीसाठी शिस्तबध्द नियोजन व कोणत्या उदिष्ठपुर्तीसाठी गुंतवणूक करावयाची या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. यासाठी प्रथमत: तुम्ही तुम्हालाच काही प्रश्र्न विचारा:
मी कीती काळ नियमीत गंतवणूक करु शकतो? याचा अर्थ तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करत असताना तुमचे सध्याचे वय काय आहे व तुम्ही तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत नियमीत गुंतवणूक करु शकता या मधील काळ हा तुमचा गुंतवणूकीचा काळ असतो. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करत अहात हेही महत्वाचेच आहे. कारण काहीही असू शकते जसे कि घर/गाडी घेणे, गृह कर्ज घेताना स्वत:चा हिस्सा निर्माण करणे, दुसरे घर/प्रॉपर्टी घेणे, मुलांचे शिक्षण/लग्न, मोठ्या ट्रिपला जाणे, निवृत्तीनंतरची सोय इ.
याचबरोबर अल्प मुदतीत आपली कोणती आर्थीक गरज भागवावी लागणार आहे याचा सुध्दा विचार करणे अत्यावश्यक असते.
तुमची उदिष्ठ ठरवताना ती उदिष्ठ पुर्ण होण्यासाठी नियमीतपणे किती गुंतवणूक तुम्ही करु शकता याचा नीटपणे विचार करा. उदिष्ठपुर्तीचा कालावधी सुध्दा नीटपणे निश्र्चित करा. यामुळे तु्म्ही तुमच्या गुंतवणूकीचे चांगल्याप्रकारे नियोजन करु शकाल.
काळ तुम्हाला अनुकूल आहे काय?
तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही किती काळ देऊ शकता? रोज काही तास कि महिन्यातील काही तास हेही महत्वाचे आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्हाल पैसे केव्हा लागणार आहेत यावरच गुंतवणूकीचा कोणता प्रकार तुम्ही निवडला पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी गुंतवणूकीच्या विवीध प्रकारातून मागील काळात कसा परतावा मिळाला आहे हे तुम्ही तपासले पाहिजे. मिळणा-या परताव्यावर कर दायित्व आहे कि नाही याचाही विचार करणे महत्वाचे असते. जर का तुम्हाला पैसे १० वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त काळाने मिळून चालणार असतील तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. जर का तुम्हाला पुढील १ ते ३ वर्षात पैसे लागणार असतील तर तुम्ही बॉण्ड फंडात गुंतवणूक करणे योग्य होईल. जर का तुम्हाला २ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही अल्प मुदतीच्या बॉण्ड फंडात किंवा एफएमपीमध्ये गुंतवणूक करणे योग्य होईल. जर तुम्हाला १ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही लिक्वीड फंडात किंवा बँक ठेवीत गुंतवणूक करणे योग्य होईल.
गुंतवणूकीचे नियोजन
एकदा का तुमचा गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय झाला कि प्रथमत: हे ठरवा कि तुम्ही किती पैशाची गुंतवणूक करु शकता. आता तुम्ही किती रक्कम प्रथमत: एकरकमी गुंतवू शकता ते पहा. यानंतर पुढे दरमहा नियमीत किती पैसे गुंतवणूकीसाठी बाजूला काढू शकता ते निश्चित करा. उत्पन्नाचे साधन कसे आहे, ते दरमहा ठरावीक आहे कि अनियमीत आहे हि गोष्ट सुध्दा तपासली पाहिजे. तुम्ही अचानक उभ्दवणा-या गरजेसाठी तरतुद केली आहे याची खात्री करा. एकदा का निर्णय झाला कि तुमच्या उदिष्ठाना पुर्ण करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात करा व घेतलेल्या निर्णयाला चिकटून रहा. विचलीत होऊ नका.
- Published in Capital Market
४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती
प्रकरण ४ थे
४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती
शेअर बाजाराचे कामकाज
शेअर बाजारातून पैसे कसे मिळवता येऊ शकतात हे जर का तुम्हाला समजून घ्यावयाचे असेल तर तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालते हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी आजकाल तुमच्याकडे डिमँट खाते असणे गरजेचे असते, असे डिमँट खाते तुम्ही कोणत्याही ब्रोकरमार्फत उघडू शकता. शक्यतो नावाजलेल्या मोठा ब्रोकरमार्फत खाते उघडणे चांगले कारण फसवणूक होत नाही, काही छोट्या ब्रोकरनी यापूर्वी गुंतवणूकदरांचे शेअर्स परस्पर विकल्याच्या घटना घडलेल्या आहेत म्हणून तुमचे डिमँट खात्यातील शेअर्स आहेत कि नाहीत हे नियमितपणे तपासा.
आता ज्या व्यक्तीला शेअर्सची खरेदी किंवा विक्री बाजारात करावयाची असेल तर त्याला प्रथमत: ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवणे गरजेचे असते. जेव्हा अशाप्रकारे शेअर्सच्या खरेदीची ऑर्डर ब्रोकरकडे नोंदवली जाते तेव्हा ब्रोकर त्याच्या सिस्टीमव्दारे तीसंबधित एक्सचेंजकडे पाठवण्याचे काम करतो. त्यानंतर ती एक्सचेंजच्या सिस्टीममध्ये रांगेत (क्यू) उभी रहाते व त्यानंतर ती सिस्टीममध्ये लॉग झाल्यानंतर तिची सिस्टीममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणा-या शेअर्समधून खरेदीच्या व्यवहाराची पुर्तता केली जाते. अशाप्रकारे व्यवहार झाल्यानंतर ते शेअर्स ब्रोकरच्या मार्फत खरेदीदाराच्या डिमँट खात्यात वर्ग (जमा) केले जातात (किंवा पेपर रुपात खरेदीदाराला प्रत्यक्ष दिले जातात).
भारतीय शेअर बाजार – एक धावती नजर
मुंबई (बॉंम्बे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व नँशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हि दोन प्राथमीक एक्सचेंजेस् भारतात अस्तित्वात आहेत. या व्यतरिक्त २२ प्रादेशीक स्टॉक एक्सचेंजेस् कार्यरत आहेत. परंतु बीएसई व एनएसी हिच महत्वाची दोन एक्सचेंजेस् असून भारतातील ८०% व्यवहार हे या दोन एक्सचेंजेस् च्या माध्यमातून दर दिवशी केले जातात. दोन्ही एक्सचेंजेस् वर जवळपास सारख्यास संख्येत रोजच्या व्यवहारांची उलाढाल होत असते. सन १९९७-९८ मध्ये रोजची सरासरी उलाढाल रु.८५१ कोटी होती, ती २०१७-१८ सालात रु.४ लाख कोटी एवढी वाढली आहे. एनएसी मध्ये २५०० पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.१२० लाख कोटी पेक्षा जास्त आहे. बीएसई मध्ये ५१३३ पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.१२५ लाख कोटी एवढे आहे. बहुतांशी प्रमुख कंपन्याचे शेअर्स हे दोन्ही स्टॉक एक्सचेंजीस् वर नोंदवलेले असल्यामुळे त्यांचे व्यवहार दोन्ही ठिकाणी केले जात असतात त्यामुळे गुंतवणूकदार दोन्ही पैकी कोणत्याही एका ठिकाणी त्याचे व्यवहार करु शकतो. दोन्ही एक्सचेंजीसची व्यवहार पुर्ततेचा कालावधी थोडा वेगवेगळा असल्यामुळे गुंतवणूकदार त्यांची पोझीशन शिफ्ट करु शकतो. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्राथमीक इंडेक्स बीएसई सेनेक्समध्ये ३० कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. तर एनएसई चा एस अँड पी एनएसई ५० इंडेक्स (निफ्टी) मध्ये पन्नास कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. बीएसई सेनेक्स हा एक जुना इंडेक्स असून तोच जास्तकरुन गुंतवणूकदारांमध्ये प्रचलीत आहे. दोन्ही कडील इंडेक्सचे अंश (indices) हे त्यामध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व कंपन्यांच्या मिळून एकत्रीत भांडवली मुल्यावर व रोजचे रोज प्रत्येक क्षणी गणले जातात. दर शनिवार व रविवारी शेअर बाजाराचे व्यवहार बंद असतात. दोन्हीकडे आता स्वयंचलीत पुर्णत: संगणकीकृत थेट (Online) व्यवहार केले जातात त्याला बोल्ट (BSE on Line Trading) आणि नीट (National Exchange Automated Trading) सिस्टीम म्हणून ओळखले जाते. यामुळे अत्यंत प्रभावीपणे व वेगाने सर्व व्यवहार केले जातात ज्यामध्ये स्वयंचलीतपणे ऑर्डर जुळवली जाणे,व्यवहारांची वेगवान पुर्तता केली तर जातेच परंतु महत्वाचे म्हणजे या सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते. बीएसई वर ज्या शेअर्सचे व्यवहार केले जातात त्यांचे ‘A’, ‘B1’, ‘B2’ ‘C’ ‘F’ व ‘Z’ या विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. यातील ‘A’ या विभागात असे शेअर्स असतात कि जे बदला (Carry Forward) मध्ये समाविष्ठ असतात. ‘F’ विभागात कर्जरोखे बाजाराचे निश्र्चित उत्पन्न साधनांची नोंद केली जाते (Debt Market – Fixed Income Securities) व यांचे व्यवहार केले जातात. ‘Z’ या विभागात काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्याचे शेअर्स असतात. ‘C’ विभागात ‘A’, ‘B1’, ‘B2’ मधील ज्या सिक्युरिटीजचे ऑड लॉट मध्ये व्यवहार केले जातात अशा सिक्युरिटीजची नोंद केलेली असते. सर्व स्टॉक एक्सचे्जीस्, ब्रोकर (दलाल), डिपॉझीटरीज, डिपॉझीटरी पार्टीसीपन्टस्, म्युच्युअल फंडस्, परदेशी अर्थसंस्था आणि अन्य सर्व सहभागीदार जे भारतातील प्राथमीक व दुय्यम भांडवली बाजारात सहभागी होतात त्या सर्वांवर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियंत्रक संस्थेचे नियंत्रण असते.
रोलींग सिस्टीम सायकल
रोलींग सिस्टीममध्ये, व्यवहाराचा प्रत्येक दिवस हा व्यवहाराचा काळ समजला जातो आणि अशा दिवसात केलेले सर्व व्यवहार हे त्या दिवसाचे निव्वळ देयक (Net obligation) समजून त्या व्यवहारांची पुर्तता केली जाते. एनएसई व बीएसई वर रोलींग सिस्टीममध्ये व्यवहार टी+२ या सुत्रानुसार म्हणजेच व्यवहाराच्या दुस-या दिवशी पुरे केले जातात. पुर्तता दिवस निश्र्चित करण्यासाठी सर्व शनिवार, रविवार, सुट्ट्यांचे दिवस ज्यामध्ये बँक हॉलीडेज, एक्सचेंज हॉलीडेज इ. वगळले जातात. उदा. मंगळवारच्या व्यवहारांची पुर्तता बुधवारी व शुक्रवारच्या व्यवहारांची पुर्तता सोमवारी केली जाते.
खरेदीची मर्यादा
समजा तुम्ही काही शेअर्स एनएसई वर विकले आहात आणि त्याचे पैसे जर तुम्हाला दुस-या सेटमेंट सायकलमध्ये वापरून परत एनएसई अथवा बीएसई वर शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरावयाचे असतील तर त्यासाठी तुमचा ब्रोकर तुम्हाला खरेदीची काही मर्यादा वापरण्यास देतो तिलाच खरेदीची मर्यादा म्हणतात. समजा तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे रु.५००००/- तुमच्या बँक खात्याव्दारा जमा केले आहात तर ब्रोकर तुम्हाला तेवढ्याच रकमेच्या किंमतीएवढे शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देईल. आता समजा सोमवारी तुम्ही रु.१,००,०००/- किंमतीचे शेअर्स विकलेत तर त्या क्षणापासून तुम्ही रु.१,५०,०००/- पर्यंतचे शेअर्स एनएसई किंवा बीएसई वर खरेदी करु शकता. आता मंगळवारी तुम्ही रु.७५,०००/- चे शेअर्स खरेदी केलेत तर शिल्लक मर्यादा राहील रु.७५,००००/- ची. म्हणजेच थोडक्यात खरेदी मर्यादा म्हणजे तुम्ही ब्रोकरकडे जमा केलेली रक्कम अधीक तुम्ही विकलेल्या शेअर्सची किंमत.
डिमटेरिअलाझेशन म्हणजे काय?
डिमटेरिअलाझेशन म्हणजेच डिमँट ज्यामध्ये गुंतवणूकदार त्याच्याकडे असणारे प्रत्यक्ष सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स,डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे इलेक्टॉनीक स्वरुपात ठेवल्या जाणा-या प्रणालीत बदली करुन घेऊ शकतो. गुंतवणूकदार त्याच्या नांवावर असणा-या सिक्युरिटीज सर्टिफिकेट ज्या डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे डिमटेरिअलाझेशन साठी पुर्वी नोंदवलेल्या असतात त्याच फक्त डिमँट करु शकतो.
डिपॉझीटरी
अशी एक संस्था जी गुंतवणूकदारांच्या सिक्युरिटीज इलेक्टॉनीक स्वरुपात सांभाळून ठेवीत असते तिला डिपॉझीटरी म्हणून संबोधीले जाते. म्हणूनच हिला सिक्युरिटीज बँक असेही म्हणता येईल. भारतात एनएसडिएल व सिडीएसएल अशा दोन संस्था हे काम करतात. डिपॉझीटरी प्रणाली हि बँकेप्रमाणेच काम करते फरक एवढाच असतो कि बँक तुमचे पैसे हाताळते तर डिपॉझीटरीज् तुमच्या शेअर्स व अन्य भांडवली सिक्युरिटीज हाताळत असते. जो गुंतवणूकदार या संस्थाच्या सेवेचा वापर करुन घेऊ इच्छितो त्याला या संस्थेकडे एक खाते डिपॉझीटरी पार्टीसिपंटचे मार्फत उघडावे लागते, हेच डिमँट खाते.
डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)
भांडवली बाजारातील मध्यस्त ज्याच्यामार्फत गुंतवणूकदाराला डिपॉझीटरी सर्व्हिसेस घेता येतात त्याला डिपॉझीटरी पार्टीसीपंट म्हणतात. सेबीच्या नियमानुसार डिपी म्हणजे अशी संस्था जी आर्थीक सेवा देते उदा. बँक, ब्रोकर्स, कस्टोडिअनस्, इ. या डिपींच्या वितरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून डिपॉझीटरीला संपुर्ण देशभर विखुरलेल्या गुंतवणूकदारांपर्यत कमी खर्चात पोहोचण्याची सुवीधा मिळते. डिपीची नियुक्ती हि अनेक बाबींची पुर्तता व सेबीच्या मान्यतेनंतर डिपॉझीटरी करत असते. यासाठी कठोर नियमाली असते. या व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊनच अनेक बँका, आर्थीक संस्था, ब्रोकर्स हे डिपी म्हणून संपुर्ण देशभर काम करत आहेत.
डिपॉझीटरी प्रणालीचे फायदे
डिमँट मधून केलेल्या व्यवहारांमुळे होणारे फायदे:
१) वाईट व्यवहाराना पुर्णत: पायबंद बसतो.
२) शेअर ट्रान्सफरच्या वेळी 0.5% स्टँप ड्युटीची बचत.
३) कुरिअर/पोस्टेजचा खर्च नाही.
४) ड्युप्लीकेट सर्टिफिकेटसाठी ब्रोकरबरोबर पाठपुरावा करण्याची गरज नाही.
५) सर्टिफकेट हरवण्याचा धोका नाही.
६) तत्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे तरलता सुलभ.
७) कमी दलाली खर्च.
८) बोनस व राईट शेअर्स डिमँट खात्यात विनाविलंब जमा होतात.
९) डिमँट स्वरुपातील शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतल्यास कमी व्याज दराचा फायदा मिळतो.
१०) जास्त कर्ज मिळते, किंमतीच्या ७५% पर्यंत विनासायास.
डिमँट खाते कसे उघडावे
बँकेत बचत खाते सुरु करण्याइतकेच डिमँट खाते उघडने सोपे व सुलभ आहे. तुम्ही कोणत्याही डिपी बरोबर खाते काढू शकता.
१) तुमच्या आवडीच्या डिपीकडे असणारा फॉर्म भरा, फोटो चिकटवा, सह्या करा.
२) डिपी बरोबरच्या करारपत्रावर, ते वाचून नंतर सह्या करा.
३) पँन कार्ड, रहाण्याचा पुरावा, बँक खाते पुरावा, फिचा चेक इ. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वसाक्षांकीत जोडा.
४) डिपीकडे वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र जमा करा.
५) डिपी तुम्हाला ग्राहक खाते क्रमांक व डिपी आयडी प्रदान करेल ज्याची नोंद डिपॉझीटरीकडे असेल.
६) तुम्ही कितीही डिमँट खाती उघडू शकता.
७) जर तुमच्याकडे सर्टि. स्वरुपात जॉईंट नांवाने शेअर्स असतील तर त्यावर ज्या क्रमाने नांवे असतील त्याच क्रमाने डिमँट खाते उघडणे श्रेयस्कर होते.
तुमच्याकडील सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स डिमँट कसे करावेत?
डिमटेरिअलायझेशनचा फॉर्म भरा. सोबत शेअर सर्टिफिकेटवर (Surrendered for Demat) असे लहून सोबत जोडा. १५ दिवसात तुमच्या खात्यात शेअर्स जमा होतील.
याचप्रमाणे एका डिमँट मधील शेअर्स दुस-या डिमँट मध्ये वर्ग करता येतात.
डिमँट खात्यातून व्यवहार करणे
सेबीने ७६१ कंपन्याचे शेअर्सचा व्यवहार हा डिमँटमधूनच करणे बंधनकारक केलेले आहे.
शॉर्ट सेलींग जर तुमच्या खात्यात शेअर्स नसतानाही जर तुम्ही शेअर्सची विक्री केली तर अशा व्यवहाराला शॉर्ट सेलींग असे म्हणतात. जेव्हा एखाद्या ट्रेडरला वाटते कि एक विशिष्ठ शेअरची किंमत त्या दिवशी कमी होणार आहे तर तो असे करतो, मात्र अशा व्यवहाराची पुर्तता त्याच दिवशी बाजार बंद होण्यापुर्वी करावी लागते (काही डिपी ते स्वयंचलीत प्रणालीचा वापर करुन करतात तर काही करत नाहीत मात्र नंतर अश्या व्यवहारांचा लिलाव ते करतात व ज्यात १००% तुमचे प्रचंड नुकसान होते).मी स्वत: असे व्यवहार कधीच करत नाही व तुम्ही सुध्दा हे करण्यात फारच जोखीम असते हे लक्षात ठेवावे. हा एक डे ट्रेडिंगमधला व्यवहार असून यात ९५% पेक्षा जास्त लोकांचे नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.मार्जीन ट्रेडिंग वस्तुत: शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्या डिमँट खात्यात पैसे शिल्लक हवेत व विक्री करण्यासाठी शेअर्स जमा हवेत. मात्र बहुतांशी ब्रोकर (डिपी) तुमच्या डिमँट खात्यात असणा-या शेअर्स अथवा रोख जमा रकमेच्या अगदी १० पटीपर्यंत किंमतीचे व्यवहार करण्याची मुभा देतात. उदा. तुमच्या खात्यात रु.एक लाख जमा आहेत तर ब्रोकर तुम्हाला १० लाख रु. किंमतीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याची मुभा देतो. समजा अ कंपनीच्या शेअरचा भाव रु.१०००० आहे तर रु.एक लाखात तुम्ही १० शेअर्स घेऊ शकता, मात्र ब्रोकर तुम्हाला ते १०० घेण्याची परवानगी देतो. जर नंतर भाव त्याच दिवशी रु.११००० झाला तर तुम्हाला एका दिवसात तुमच्या एक लाखावर एक लाख रु. फायदा होतो, तेच भाव ९००० झाला तर संपुर्ण एक लाख रुपये नुकसान होते. या सुविधेलाच मार्जीन ट्रेडिंग असे म्हणतात.मी हि सुवीधा कधीच वापरत नाही. यात फारच मोठा धोका असतो. ९५% पेंक्षा जास्त लोकांचे अशा व्यवहारात (एकूणच डे ट्रेडिंग मध्ये) नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.अमेरिकन शेअर बाजारात ह्या प्रकाराला परवानगीच नाही.ऑर्डरचे प्रकारलिमीट ऑर्डर: एक दराची मर्यादा घालून प्लेस केलेली ऑर्डर. समजा रिलायन्सच्या शेअरची आस्क किंमत रु. १०१०, परंतु तुम्हाला तो रु.१००० ला घेणे योग्य वाटत असेल तर तुम्ही रु.१००० च्या दराने लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. जर त्या शेअरची किंमत १००० किंवा त्यापेक्षा कमी झाली तरच तुमच्या ऑर्डरची पुर्तता होऊन शेअर्स तुमच्या खात्यात जमा होतील. समजा त्या दिवशी रिलायन्सची किंमत रु.९९० झाली व त्यावेळी जर आस्क किंमत रु.९९४ असेल तर तुमच्या खात्यात ९९४ च्या दराने शेअर्स जमा होतील. याचप्रकारे तुम्ही विक्रीसाठीसुध्दा लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. उदा. तुमच्याकडे ९९४ ने खरेदी केलेला रिलायन्सचे शेअर्स आहेत व तुम्हाला वाटते जर रु.१०१२ किंमत मिळाली तर तो विकावा, तर तुम्ही रु.१०१२ च्या लिमीट ऑर्डर नोंदवा, दर १०१२ किंवा अधीक झाला तर व्यवहार पुर्तता होईल. यालाच लिमीट ऑर्डर म्हणतात.मार्केट ऑर्डर: त्या क्षणी असणा-या दराने दिलेली खरेदी-विक्रीची ऑर्डर. अशा वेळी ऑर्डर पुर्ततेच्या क्षणी असणा-या दराने ऑर्डरची पुर्तता केली जाते. मग ती कमी अथवा जास्तसुध्दा होऊ शकते.स्टॉप लॉस ऑर्डर: यालाच ट्रिगर प्राईज ऑर्डर असेही म्हणातात, याचा उपयोग संभाव्य नुकसान मर्यादित करण्यासाठी केला जातो. याचा वापर अत्यंत हुशारीने करावा. |
सर्किट फिल्टर व ट्रेडिंग बँडस्बाजारातील चढ उतारावर (अस्थीरतेवर) मर्यादा असावी म्हणून सेबीने काही नियम केलेले आहेत व किंमतीनुसार दिवसातील कमाल व किमान दरातील फरक ठरविलेला आहे. त्यानुसार ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० ते रु.२० च्या दरम्याने आहे त्यांची किंमत दिवसात २५% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० पेक्षा आहे त्यांची किंमत दिवसात ५०% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.२० पेक्षा जास्त आहे त्यांची किंमत दिवसात ८% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. मात्र १०० निवडक शेअर्सचे बाबत ८% च्या नियम ८% व एक तासानंतर परत ८% असा शिथील केलेला आहे. या गणणेसाठी आदल्या दिवसाचा बंद भाव आधारभूत ठेवलेला आहे. एनएसई व बीएसई वरील बंद भाव वेगवेगळा असू शकतो म्हणून दोन्हीकडचे सर्किटही वेगळे असू शकते.बदलाबदला म्हणजे कशाच्यातरी बदल्यात सौदे पुढे चालू ठेवणे (Carry Forward). बदला हि एक प्रकारची सौदे पुढे चालू ठेवण्यासाठी दिलेली फि (आकार) असते. हे एक हेजींगचे माध्यम आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष शेअर्सचा ताबा न घेता त्या शेअर्समध्ये आपला सहभाग (Position) चालू ठेवू शकतो. या साठी त्याला थोडी फि द्यावी लागते. हे झाले शेअर्सच्या खरेदीबाबत पण तेच जर का त्याला शेअर्सचे शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी द्याव्या लागणा-या फिला उंधा बदला असे म्हणतात. या बदला प्रकारामुळे ३ प्रकारच्या गरजा भागवल्या जातात:१) क्वसी हेजींग: जर गुंतवणूकदाराला वाटत असेल कि एखाद्या शेअरची किंमत पुढील काही काळात वाढणार/घटणार आहे, तर अशा वेळी शेअर्स प्रत्यक्षात न घेता/देता तो या पद्धतीने व्यवहार करून अस्थीर बाजारात सहभागी होऊ शकतो.२) शेअर गहाणवट (Stock Lending): जर त्याला प्रत्यक्ष विक्रीसाठी शेअर्स नसतानासुध्दा शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी काही आकार घेऊन हे करण्यास तयार असणारे शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला हि सुवीधा उपलब्ध करुन देतात.३) कर्ज व्यवहार (Financing Mechanism) : जर तुम्हाला शेअर्सची पुर्ण किंमत दिल्याशिवाय ते खरेदी करावयाचे असतील तर शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला यासाठी पैसे काही आकार (व्याज) घेऊन पुरवतात. या व्यवहाराला “व्याज बदला” किंवा “बदला” म्हणतात.हा व्यवहार समजून घेण्यासाठी आपण एक उदाहण पाहूया. क्ष या व्यक्तीने इंफोसीसचे १००० शेअर्स खरेदी केलेले आहेत मात्र त्याचा ताबा घेण्यासाठी त्याला त्याची पुर्ण किंमत देणे आवश्यक आहे परंतु क्ष कडे तेवढे पैसे खात्यात शिल्लक नाहित, अशावेळी तो शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या “बदला” व्यवस्थेची सुवीधा वापरु शकतो. आता काय होते कि जी व्यक्ती क्ष ला बदला व्यवस्थेतून हा खरेदीचा व्यवहार पुर्ण करण्यासाठी पैसे देण्यास तयार असते ती व्यक्ती क्षच्या वतीने ते शेअर्स खरेदी करते आणि क्ष ला त्याने कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर फक्त व्याज द्यावे लागते. याच्या उलट जर का क्ष कडे शेअर नसतानासुध्दा त्याने विक्री केलेली असेल तर त्याच्याकडे दुस-याला डिलेव्हरी देण्यासाठी शेअर्स नसतात म्हणून स्टॉक एक्सचेंज मार्फत तो ज्याच्याकडे शेअर्स असतात अश्या व्यक्तीकडून ते उधार घेतो व त्यासाठी त्याला व्याज (बदला) द्यावा लागतो. गुंतवणूकदार म्हणून तुम्ही बदला सेवा घेऊ किंवा देऊ शकता. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हि सेवा व्याज भरुन घेता व जर तुमच्य़ाकडे पैसे किंवा शेअर्स असतील तर व्याज (बदला) घेऊन हे सेवा तुम्ही स्टॉक एक्सचेंज मार्फत दुस-याला देऊ शकता. दर शनिवारी बीएसई मध्ये बदला व्यवस्थेसाठी एक सत्र चालते ज्यात या व्यवहारात ज्या शेअर्स/सिक्युरिटिजचे पोटी उधार व्यवहार असतात त्यांची यादी तयार केली जाते. बाजारात उपलब्ध असणा-या रोखतेवर व्याजाचे (बदल्याचे) दर ठरतात. जेव्हा बाजारात जास्त खरेदी होते तेव्हा बदला दर जास्त असतो व जेव्हा बाजारात विक्री जास्त होते तेव्हा बदला दर कमी असतो. बदला व्यवहारांसाठी फक्त ‘A’ विभागातील शेअर्स, ज्यांचा डिव्हीडंड जास्त व नियमीत मिळण्याचा पुर्वेतिहास आहे, ज्याना उच्च तरलता (Liquidity) असते, ज्यांची रोजच मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असेच ए गृपमधील शेअर्स विचारात घेतले जातात. गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळावा म्हणुन या व्यवहारांसाठी कोणते शेअर्स ग्राह्य धरले जातील हे अगोदर जाहिर केले जात नाही. या प्रकारातील सौदे पुर्ण केले जाण्याची खात्री असते व त्यासाठी ट्रेड गँरण्टी फंड ऑफ बीएसई हा निर्माण केलेला आहे, त्यामुळे अशा व्यवहारात सौदा पुर्तीची जवळपास जोखीम नसते, फक्त जर का तुमचा ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरच जोखीम येऊ शकते ज्याची शक्यता जवळपास नसते. आणि जरी ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरी शेअर्स तुमच्याच मालकीचे असतात ते तुम्ही केव्हाही विकू शकता, फक्त बाजाराच्या अस्थिरतेची अशा वेळी जोखीम राहिल.सिक्युरिटी लेंडिंगहि व्यवस्था एनएसईची असून हि बीएसईच्या बदल्याप्रमाणेच काम करते फक्त यात सौदे पुढे चालू ठेवण्याची मुभा नसते.इनसायडर ट्रेडिंगभारतात इनसायडर ट्रेडिंगवर बंदी आहे. जी माहिती संवेदनशील आहे व ज्यामुळे शेअरच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो व ती माहिती, माहितीच्या नियमीत स्त्रोतापेक्षा अन्य ठिकाणापेक्षा (कंपनीच्या अंतर्गत) मिळवून स्वत:च्या फायद्यासाठी कंपनीच्या पदाधीका-यानी वापरुन त्या माहितीचा उपयोग करुन शेअर ट्रेडिंग करणे याला बंदी आहे. या बाबत सेबीचे कायदे अत्यंत कडक आहेत. या बाबत अधीक माहिती सेबीच्या https://www.sebi.gov.in/ साईटवर आहे. |
- Published in Capital Market
३. शेअर बाजारात गुंतवणूक का करावी?
प्रकरण ३ रे
३. शेअर बाजारात गुंतवणूक का करावी?
भांडवाली बाजारातील गुंतवणूकीची ओळख
बहुतांशी व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणूकीची सुरुवात चुकीच्या पध्दतीने करतात:
१) त्याना एखाद्या कंपनीच्या शेअर्सबाबत एखादी बातमी/अफवा एक तर त्यांच्या ब्रोकर (दलाल) मार्फत किंवा त्यांच्या मित्राकडून मिळते,सांगणारा सांगतो कि हि अगदी हॉट टिप आहे.
२) त्या बातमी किंवा अफवेवर विसंबून ते लोकं त्या कंपनीचे शेअर्स अगदी डोळे झाकून कोणताही विचार नकरता विकत घेतात.
३) खरेदी करुन झाल्यावर काही दिवसांनी त्यांनाच आश्र्चर्य वाटू लागते कि मी हा शेअर का खरेदी केला व ते डोक्याला हात लावून बसतात.
अशाप्रकारे गुंतवणूकीची सुरुवात करणा-या व्यक्तीना काय म्हणायचे? खरं पहाता अशी कोणतीही बातमी तुम्हाला समजली तर तुम्ही त्याची खातरजमा केली पाहिजे. बातमीचे खरेपण तुम्ही www.nseindia.com किंवा www.bseindia.com या पैकी कोणत्याही संकेतस्थळाला भेट देऊन करू शकता, कारण स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झालेल्या कोणत्याही कंपनीबाबत कोणतीही बातमी जर असेल तर ती या संकेतस्थळावर दाखवली जाते. मग ती बातमी कंपनीच्या एखाद्या घोषणेबाबत असो किंवा डिव्हीडंड बाबत असो अथवा एखाद्या दुस-या कंपनीत विलीनीकरणची असो नाहीतर दुसरी एखादी कंपनी ताब्यात घेण्याबाबतची असो, अशी कोणतीही बातमी या दोन्ही किंवा ज्या स्टॉक एक्सचेंजवर कंपनीची नोंदणी झालेली असेल त्याच्या संकेतस्थळावर हि बातमी लगेचच दाखवली जाते.
त्यानंतर पुढील गणिती बाबीं तपासून पहा. संबंधीत कंपनीच्या प्रती शेअर मिळतीच्या वाढीचा अभ्यास टक्केवारी व आलेखाव्दारे करा, हि माहिती तुमच्या ब्रोकरच्या संकेतस्थळावर दिलेली असते. हे कसे करावे याची माहिती “तांत्रीक (टेक्नीकल) विश्लेषण” या लेखात दिली जाणार आहे. पी/ई रेशो (किंमत व मिळकत यांचे गुणोत्तर – Price to Earning Ratio), भांडवलाचे बाजारी मुल्य व विक्री यांचे गुणोत्तर – (Market Capitalization to Sales Ratio), इपीएस (प्रतीशेअर मिळकतिचे गुणोत्तर -Earnings Per Share), पुढील तिमाहीमध्ये होणा-या मिळकतीतील संभाव्य वाढ. त्यानंतर तपासा कंपनीची मागील कामगिरी ज्यामुळे समजेल कि भूतकाळात कंपनीची आर्थीक वाटचाला कशी झाली होती. आता तपासून पहा कि सध्या त्या शेअरची बाजारातील वाटचाल कशी आहे यासाठी तपासले पाहिजे ते रिअल-टाईम कोट, प्रतीदिन सरासरी होणारे खरेदि-विक्रीचे व्यवहार, किती शेअर्सच्या मुल्याचे भरणा होणे बाकी आहे, लाभांशाचा इतिहास,दिवसातील कमाल व किमान भाव पातळी, ५२ आठवड्यातील कमाल व किमान भाव पातळी. हे असे केल्याने तुम्हाला संबंधीत कंपनीच्या कामकाजाची व शेअर्सच्या वाटचालीचा अंदाज येतो. तसेच तुम्हाला खालील बाबींची माहिती असणे आवश्यक असते:
कमाल (High): दिवसातील शेअरची कमाल किंमत.
किमान (Low): दिवसातील शेअरची किमान किंमत.
बंद (Close): दिवस अखेरची शेअरची किंमत किंवा बंद भाव
बदल (Change): लागोपाठच्या दोन दिवसातील शेअरच्या बंद भावातील फरक.
उत्पन्न (Yield): मागिल दिला गेलेला लाभांश (टक्केवारी) भागिले एका शेअरची किंमत.
मागणी पुरवठा किंमत (Bid & Ask – Offer – Price):
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरच्या खरेदीची मागणी नोंदवता किंवा जेव्हा तुम्हाला तुमच्याकडील शेअर विकावयाचा असेल तर तुम्हाला त्या शेअरची “बीड” व “आस्क” किंमत माहित असणे अत्यावश्यक असते. आता याचा अर्थ काय?
“बीड” म्हणजे खरेदीदाराने ठरवलेली सदर शेअरची किंमत. तुम्ही जेव्हा शेअरची विक्री करु इच्छित असाल तेव्हा तुम्हाला हि किंमत माहित असलीच पाहिजे. बीड म्हणजे ज्या किंमतीला/दराने तो शेअर खरेदी करावयास दुसरी व्यक्ती म्हणजेच खरेदीदार तयार असतो.
“आस्क” (ऑफर) बाबत तुम्हाला माहिती असावयाला हवी जेव्हा तुम्हाला एखादा शेअर खरेदी करावयाचा असतो, तेव्हा कारण आस्क म्हणजे अशी किंमत कि ज्या किंमतीला दुसरी व्यक्ती म्हणजेच विक्रेता हा त्याच्याकडील एखादा शेअर विकावयास तयार असतो. विक्रेता त्याला त्याने ठरविलेल्या “आस्क” किंमतीला शेअरची विक्री करत असतो.
बीड व आस्क चा आकार (Bid Size & Ask – Offer Size):
जर तुम्ही तुमच्या संगणकाच्या पडद्यावर उदा. एबीसी लि. या कंपनीची या बाबतची माहिती पहात असाल तर ती तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल:
बीड किंमत: २४५०
आस्क (ऑफर) किंमत: २४९५
बीड नग: ३५ टी
आस्क (ऑफर) नग: १८ टी
याचा सरळ अर्थ असा आहे कि, एबीसी या कंपनीच्या ३५००० शेअर्सची मागणी प्रती शेअर रु.२४५० या दराने आहे. मात्र त्या कंपनीचे फक्त २०००० शेअर्स रु.२४९५ या दराने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागणी व पुरवठा हा महत्वाचा घटक आहे कारण त्या आधाराने समजते कि शेअरची किंमत कोणत्या दिशेने जाणार आहे.
तुम्हाला एकदा का हि माहिती मिळाल्यावर तुम्हाला एखादा चांगला शेअर खरेदी करण्याची संधी साधता येऊ शकते. पण थांबा घाई करु नका,थोडी अधिक माहिती मिळवूनच निर्णय घ्या, आता हे तपासून पहा कि कोण हा शेअर खरेदी करण्यास तयार आहेत (परदेशी अर्थसंस्था,म्युच्युअल फंडस्, मोठी औद्योगीक संस्था, या पैकी कोण? या बाबतची माहिती कशी मिळवावी हे पुढील काही प्रकरणातून मी देणार आहे). नंतर दर दिवसाची संबंधीत शेअरची उलाढाल म्हणजेच सरासरी प्रतीदिन उलाढाल किती आहे ते तपासा. जर हि गेल्या अनेक दिवसातील सरासरीपेक्षा जास्त असेल तर कोणीतरी हे शेअर्स जास्तप्रमाणात जमा करत असू शकेल.
यापुढे ज्यावेळी तुम्हाला एखादी “हॉट टिप” मिळेल तेव्हा वर सांगितल्याप्रमाणे त्याबाबत तपासणी करुन मगच त्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घ्या. एकदा का तुम्हाला अभ्यास करण्याची सवय लागली कि तुम्हाला तेजीचा अंदाज अनेकवेळा अगोदरच येईल.
- Published in Capital Market