शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा?
शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा?
शेअर बाजारात ट्रेडिंग करून अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीत फायदा मिळवून जास्तीच्या खर्चाला हातभार लावावा किंवा तो फायदा दीर्घ मुदतीसाठी गुंतवून संपत्ती निर्माण करावी असे वाटते काय.. जर तुम्हाला खरोखर असे वाटत असेल तर या पानावरील माहिती शांतपणे वाचून घ्या, समजून घ्या.
प्रश्न – १: शेअर बाजारात ट्रेडिंग करून किती लोकांना फायदा होतो?
उत्तर: तुमच्या आजूबाजूचे बहुतांशी लोक तुम्हाला सांगतील कि शेअर बाजार म्हणजे एक जुगार आहे. यातून पैसे मिळत नाहीत तर जातात म्हणजेच नुकसान होते. शेअर बाजारात ट्रेडिंग करणार्यांपैकी बहुतांशी लोकांना नुकसानच होते कारण ते चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी व कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर बाजारात उडी घेतात, कोणत्यातरी माहित नसलेल्या कंपनीचा शेअर विकत घेतात, त्याचा भाव गडगडला कि विकून बाहेर पडतात व नुकसान सोसतात आणि मग त्याची दुषणे शेअर बाजाराला देतात. अनेक सर्व्हे असे दाखवतात कि जेव्हा बाजारात पूर्ण तेजी असते व जेव्हा तो उच्चतम पातळीवर असतो त्यावेळी बहुतांशी लोकं बाजारात गुंतवणूक करतात. तेजी नंतर मंदी व मंदी नंतर तेजी अशी आवर्तने सदैव बाजारात चालू असतात. सर्वसाधारणपणे बाजारात नेहमीच चढ उतार हे असतातच, आणि ते तसे असतात म्हणूनच तर ट्रेडिंग करून फायदा मिळवता येतो. एका सर्व्हेक्षणानुसार असे सिद्ध झालेले आहे कि गेल्या पन्नास वर्षात बाजारात तेजीचा कालखंड हा साधारणपणे ३ ते ५ वर्षे टिकून असतो, अशा सततच्या तेजीचे कालखंडा नंतर मंदी हि येतेच मात्र अशा मंदीचा सरासरी कालखंड हा ९ महिने एवढाच असतो. खरे पाहता अशी मंदी म्हणजे अल्प काळात उत्तम नफा मिळवण्याची संधी असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारात जेव्हा मंदीचा कालखंड संपून परत तेजीचा कालखंड सुरु होतो तेव्हा बाजार मागील तेजीतील उच्चतम पातळी ओलांडून एक नवीन उच्चतम पातळी तयार करत असतो असा इतिहास आहे.
वरील गोष्ट समजून घेण्यासाठी आता आपण BSE सेन्सेक्स मधील काही महत्वाचे चढ उतार समजून घेऊया. सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला व तो आज दि. १८ ऑक्टोबर २०१७ ला ३२५८४ एवढा आहे म्हणजेच जर का तुम्ही १९७९ साली रुपये १०० सेन्सेक्स मध्ये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य रु.३२,५८४/- एवढे झाले असते. परंतु या कालखंडात तो सतत वरच गेला आहे का? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. १९९२ साली सेन्सेक्स ने त्यावेळची उच्चतम पातळी ४५०० गाठली, त्यानंतर हर्षद मेहता चा घोटाळा उघड झाला व सेन्सेक्स १५०० पर्यंत खाली आला, हि बाजारातील पहिली मोठी तेजी मंदी. यानंतर २००० साली त्याने मागील उच्चतम पातळी तोडून ६३०० ची उच्चतम पातळी त्याने तयार केली,यानंतर आय.टी. बबल फुटला आणि तो २१०० पर्यंत खाली आला. हि दुसरी मोठी तेजी मंदी. यानंतर जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स ने मागील उच्चतम पातळी ओलांडून २१२३२ ची नवीन उच्चतम पातळी निर्माण केली. यानंतर अमेरिकेत सब-प्राईम घोटाळा बाहेर पडला, तिकडे अनेक आर्थिक संस्था, बँका अडचणीत आल्या, त्यातील काही बुडाल्या व सेन्सेक्स मार्च २००९ मध्ये ७६०० च्या नीचतम पातळीवर येऊन पोहोचला,पुढे ८ महिन्यातच तो परत १८००० पार करून गेला, २०१३ मध्ये परत तेजी सुरु झाली व २०१४-१५ मध्ये त्याने ३०००० ची उच्चतम पातळी पार केली. २०१५-१६ मध्ये चीन मध्ये आर्थिक संकट आले त्याच्या परिणाम स्वरूप बाजार २०००० पर्यंत खाली आला व सध्या तो ३२५८४ च्या जवळ आहे.
मात्र खरे पाहता बाजाराची मुलतत्वे वापरून जर का तुम्ही गुंतवणूक/ट्रेडिंग केले तर निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. फ्युचर्स, ऑप्शन,इंट्रा दे यांचे नादी लागला नाहीत, चांगल्या मोठ्या नामांकित कंपन्यांचे शेअर्सची किंमत जेव्हा खाली येते तेव्हा ते जर का तुम्ही खरेदी केले व ते वाढल्यावरच विकावयाचे असे धोरण ठेवले तरच तुम्हाला निश्चित व चांगला नफा होऊ शकतो. यासाठी सर्वात महत्वाचे आहे स्वत:चे निर्णयावर ठाम राहणे, विश्वास ठेवणे व संयम पाळणे.
अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्या वस्तूची किंमत वाढते ती कालांतराने कमी होते व ज्या वस्तूची किंमत कमी होते ती कालांतराने वाढतेच,जगात सारे काही किंमतीतील चढ उतार हे मागणी व पुरवठा या न्यायाने होत असतात. जेव्हा उपलब्धता कमी होऊन मागणी वाढते तेव्हा किंमत वाढते व जेव्हा उपलब्धता भरपूर होते, सारेच लोक विकावयास लागतात तेव्हा साहजिकच मागणी कमी होते व किंमतही कमी होते. म्हणून तर काधीतरी कांदा १० रुपये किलो असतो तर कधी तो १०० रुपये किलोने विकला जातो. हेच सूत्र शेअर बाजारालाही लागू पडते.अर्थशास्त्राचा हा नियम शेअर बाजाराला व मुख्यत्वे करून मोठ्या कंपन्यांना तंतोतंत लागू पडतो.
जेव्हा जेव्हा एखादा शेअर त्याचे वर्षातील नीचतम पातळीच्या जवळ येतो तेव्हा तो त्या पातळीपासून १०% ते २०% या रेंज मध्ये अनेक वेळा वर खाली होत असतो, हि वेळ शेअर्स ट्रेडिंग करून पैसे मिळवण्यासाठी चांगली होऊ शकते.
ट्रेडिंग करताना किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहोत हे महत्वाचे असते:
अल्पकालीन दृष्टिकोन: हा साधारणपणे एक आठवडा ते ३ महिने असावा, या काळात शेअर निवडताना टेक्नीकल, सध्याचा ट्रेंड व फंडामेंटल यांचा एकत्रित विचार करून तो शेअर खरेदी करावा आणि त्याचे किंमतीत ट्रेंड प्रमाणे ३% ते १५% या दरम्याने नफा झाला असताना तो विकून टाकावा. जर तो या काळात सतत वाढत असेल तर, विकण्याची घाई न करता जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यावा. जर तो जास्तच व्होलाटाईल असेल तर कमी फायद्यात ३ ते ५% बाहेर पडावे व दुसरी संधी पहावी.
मध्यम कालीन दृष्टीकोन: हा साधारणपणे एक महिना ते सहा महिने एवढा असावा. या काळात शेअर निवडताना टेक्नीकल, सध्याचा ट्रेंड व फंडामेंटल यांचा एकत्रित विचार करून तो शेअर खरेदी करावा आणि त्याचे किंमतीत ट्रेंड प्रमाणे ८% ते २०% या दरम्याने नफा झाला असताना तो विकून टाकावा. जर तो या काळात सतत वाढत असेल तर, विकण्याची घाई न करता जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यावा. जर तो जास्तच व्होलाटाईल असेल तर कमी फायद्यात ३ ते ५% बाहेर पडावे व दुसरी संधी पहावी.
दीर्घकालीन दृष्टीकोन: हा साधारणपणे ६ महिने ते एक वर्ष किंवा जास्तच असू शकतो. या कालावधीत नफ्याची अपेक्षा १०% ते २५% एवढी असावी.
जर आपण घेतलेला शेअरची किंमत कमी होत असेल तर ती १०% कमी होईपर्यंत काहीच करू नये मात्र जर ती १०% पेक्षा जास्त खाली आली तर परत तेव्हढेच शेअर खरेदी करून सरासरी करावी. नॉर्मल कोर्स मध्ये अशी सरासरी एक ते दोन वेळाच करावी लागते, नंतर नफ्यात विकण्याची संधी मिळते ती मात्र सोडू नये.
शेअर निवडताना कंपनीची पूर्ण माहिती मिळवावी चांगला व्यवसाय करणारी, सातत्यपूर्ण नफा मिळवणारी, पहिल्या १०० मधील कंपनी शक्यतो निवडावी, EPS, P/E हे अवश्य पाहावेत.
वरीलप्रमाणे पथ्य पाळल्यास तुम्हाला निश्चितच चांगला नफा वर्षोनुवर्षे नियमितपणे मिळू सकतो. मात्र ८ ते १० वर्षात जेव्हा मोठी मंदी येते तेव्हा तुम्हाला कदाचित एक ते दीड वर्षे नफ्यात येण्यासाठी थांबावे लागू शकते हे विसरू नये, अशा मंदीचे कालखंडात सतत जास्तीची खरेदी करून सरासरी करत राहावे, तुम्हाला संधी हि मिळणारच आहे.
जर तुमची ३ ते ५ वर्षे थांबण्याची तयारी असेल तर ज्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत ५०% ते ६०% कमी झालेली असेल ते शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता असे शेअर्स तुम्हाला ३ ते ५ वर्षात २०० ते ३००% सुद्धा फायदा मिळवून देऊ शकतात. सध्या अनेक फार्मा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव असे खाली आलेले आहेत. उदा. सन फार्मा या दिग्गज औषधी कंपनीचा शेअर वर्ष दोन वर्षापूर्वी १२०० पेक्षा जास्त होता, सध्या तो ५४० च्या आसपास आहे, १४ ऑगस्ट २०१७ ला तर तो ४३२ पर्यंत खाली आला होता. याला यु.एस.एफ.डी.ए., इ. अनेक कारणे असतात. पण हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही असे शेअर्स खरेदी केले पाहिजेत व ते वाढण्याची वाट पहिली पाहिजे तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा मध्यम मुदतीत मिळत असतो.
बाजारात तेजीवाले व मंदीवाले असे दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात, जेव्हा मोठी तेजी असते तेव्हा तेजीवाले सतत ओरडत राहतात कि बाजार आणखीन वर जाणार आहे खरेदी करा, पैसे मिळवा, तर बाजारात जेव्हा मोठी मंदी असते तेव्हा मंदीवाले सतत ओरडत राहतात कि बाजार आणखीन खाली जाणार आहे विकून टाका, बाहेर पडा. खरे म्हणजे ते तुम्हाला उल्लू बनवत असतात व स्वत: पैसे मिळवत असतात. शहाणे व्हा पैसे निश्चित मिळतील.
- Published in Capital Market
गुंतवणूकीचे साधे नियम
गुंतवणूकीचे साधे नियम
गुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.प्रथमत: प्लान तयार करा:प्रथमतः तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. गुंतवलेल्या रकमेपैकी जी रक्कमतुम्हाला पुढील २ ते ३ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट, फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा ती फायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेपैकी योग्य त्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा. यासाठी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित (Balanced Schemes and Balanced Advantage Fund) व इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम अशा प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, योग्य योजनेची निवड करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. म्युचुअल फंड किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करतना नेहमीच गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला महत्वपूर्ण असतो कारण तो त्याच्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला सल्ला देत असतो.साधी गोष्ट:दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणेच तुमच्या हिताचे असते. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.नियमित गुंतवणूक करत रहा:आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि जी बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.गुंतवणूक करा पण विकू नका:अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold.टिपवर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका:कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करू नका. अनुभवी गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणेच गुंतवणूक कारणे तुम्हाला फायदेशीर होईल.जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका:जास्त व्याचाचे आमिष आहे म्हणून सहकारी पतसंस्था वगैरे ठिकाणी गुंतवणूक करू नका, कारण यातील एखादा संचालक जरी लबाडी करणारा निघाला तरी अशी संस्था बुडू शकते व तुमचे पैसेही बुडण्याची शक्यता असते.MLM, भीशी, चीट फंड इ. योजनांपासून दूर रहा:अशाप्रकारच्या योजनेतून फक्त सुरुवातीच्या लोकांनाच फायदा मिळतो व नंतर सामील होणाऱ्या सर्वच लोकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अशा योजना जरी तुमचा जवळचा मित्र किंवा अगदी नातेवाईक घेऊन आला तरी त्याला नाही म्हणायला शिका हाच भविष्यात होणाऱ्या नुकसानीला टाळण्याचा एकच मार्ग आहे. एक लक्षात ठेवा जगात अशी कोणतीही योजना नसते कि जी तुम्हाला अल्प काळात श्रीमंत बनवू शकेल.शेअर बाजारातील डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग आदी मोहांपासून दूर रहा.डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून झटपट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते पण एक लक्षात ठेवा कि हा एक प्रकारचा सरकारमान्य जुगारच आहे व जुगार खेळून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, जुगार चालवणारा मात्र श्रीमंत होतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून कधीतरी अल्प काळात भरपूर फायदा होऊ शकतो मात्र तो एकदा का मिळाला कि याचे एकप्रकारे व्यसनच लागते, जे सुटता सुटत नाही व मग यात मिळालेला फायदा तर जातोच परत मुद्दलहि जाते, येथे लाखाचे बारा हजार होणे हि म्हण तंतोतंत लागू पडते.लवकर सुरुवात करा:एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कि शेअर बाजारातून फक्त दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच उत्तम प्रकारचा फायदा हमखासपणे मिळत असतो म्हणून गुंतवणूकदार व्हा, ट्रेडर होऊ नका. सर्वसामान्य माणसासाठी म्युचुअल फंड हे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे सरासरीचा फायदा होतो. चक्रवाढीची ताकद हि एक जादूच आहे असे समजा, यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम दीर्घ काळानंतर अत्यंत वेगाने वाढू लागते हे लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:रअवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टीका टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावना काबूत ठेवावयास शिकले पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ठाम रहा. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा. |
विमा हि गुंतवणूक नाही:
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि जीवन विमा व गुंतवणूक हे पूर्णतः स्वतंत्र विषय आहेत याची गल्लत करू नका. विमा अत्यावश्यकच आहे परंतु तो गुंतवणूक म्हणून समजू नका. विमा फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारचाच घेतला पाहिजे.
देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणलेली आहेत. अशी केलेली गुंतवणूक किमान ५ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही, तसेच दर वर्षी किमान ५ वर्ष हप्ते भरावे लागतात. असेच अशा योजनेत अनेक प्रकारचे चार्जेस असतात ते समजून घेतलेत तर तुम्ही यात कधीही गुंतवणूक करणार नाही. कारण हे चार्जेस सारा फायदा खाऊन टाकतात. यातील चार्जेसवसुलीसाठी तुमची युनिट्स कमी होतात.
म्युच्युअल फंडात मात्र केव्हाही गुंतवणूक करता येते व केव्हाही काढता येते. तसेच गुंतवलेली संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. यातील सर्वमिळून चार्जेस हे २.५% पेक्षा जास्त नसतात. युनिट्स पैसे काढल्याशिवाय कधीही कमी होत नाहीत. गरजेचेवेळी ५ दिवसात खात्यात पैसे जमा होतात.फक्त फायद्यात असताना गुंतवणूक काढण्याचे पथ्थ पाळणे हिताचे असते.
जर आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु.७५०० मध्ये रु.५० लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते.
कोणतीही गुंतवणूक जर दीर्घ काळासाठी केली तर चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या व्याजाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्युचुअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या २५ वर्षात सरासरी २०% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिलेला आहे, म्हणूनच काही योजनेत १९९५/९६ सालात ज्यांनी रु.१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य रु.५० लाख ते रु.१ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेले २५ वर्षे नियमित दर महा रु.५००० एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांची आजपर्यंत एकूण गुंतवणूक रु.१५ लाख इतकी झालेली आहे मात्र त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य सुमारे रु.३ कोटी ५० लाख इतके झालेले आहे. म्हणून गुंतवणूक करताना दीर्घ कालीनच विचार केला पाहिजे. बाजारात तेजी नंतर मंदी व मंदी नंतर परत तेजी हि आवर्तने चालूच असतात. मात्र शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत दीर्घ काळात तेजी मंदीवर मात करून उत्तम परतावा देण्याची ताकद असते हे लक्षात ठेवले पाहिजे.
तुम्हाला जर आयकर कलम ८०-सी चा फायदा मिळण्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर जीवन विमा, ५ वर्षांची बँक ठेव, पी.पी.एफ. याचेपेक्षा म्युचुअल फंडाच्या Equity Savings Schemes चा आपण विचार केला पाहिजे कारण यातून जास्त परतावा तर मिळतोच परत तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध असते.
- Published in Articles
नियमित गुंतवणूक फायदे
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):
हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.
गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी. बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते. या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी. तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी.
- Published in Investment
- 1
- 2